Sunday, August 9, 2015

केल्याने देशाटन..

आज कचेरीमधे(ऑफीस) अजिबातच काही काम नव्हतं. आणि दुधात साखर म्हणजे बॉस रजेवर! अशी सुवर्णसंधी म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दहा ः)ः)
पण छे! या आंग्रजाळलेल्या वातावरणात मन रमत नाही हेच खरं. आता अवघी दोन वर्ष झाली मला इथे येऊन. नवरा म्हणाला होता मला, 'सुरुवातीला येईल आठवण. करमेनासं होईल. पण एकदा का इथे रुळलीस तर मग जायच नाव घ्यायची नाहीस.' मी अजूनही त्या दिवसाची वाट बघतीये. दोन वर्षांनी जेव्हा पहिल्यांदा भारतात गेलो तेव्हा जातानाच मला म्हणाला, 'आता गेल्यावर बघ, तुझ तुलाच वाटेल की नको यायल परत इकडे, नव्या देशातच बरं आहे'.
पण असही काही नाही झालं.
बाहेरचा परिसर, बाहेरच वातावरण कसही असलं तरी आपलं घर, घरातली माणसं, अंगण, परसदार, झालचतर घरातली प्रत्येक गोष्ट जी आपण आवडीने आणली, सजवली.. सगळं सगळं कुठेतरी आत मनाला मायभूमीची ओढ लावून ठेवतच नाही का.
काही काम नाही म्हणून वॉकसाठी बाहेर पडले. मनात विचार आला, का बरं अस होत कि इथे सगळं छान असूनही राहूनही, इथे आपलं मन रुळत नाही. खरचं अस काय काय आहे जे आपल्या घराची ओढ लावतं.
मी स्वतःलाच पडताळून पहात होते. ‘माझ्या मनातली अबोली सांगू लागली..’ खरं तर बरयाचं गोष्टी आहेत. म्हटलं तर छोट्या, पण तरीही महत्त्वाच्या.
आता अगदी साधी गोष्ट म्हणजे चहा. मी काही फार चहावेडी नाही पण घ्यावासा वाटतो चहा अधेमधे.
इथे लोकांना फक्त आणि फक्त कॉफीच वेड आहे. चहा घेणारे म्हणजे, असे माझ्यासारखे परदेशाहून आलेले. ऑफीसमधे एक तर ग्रीन टी नाहीतर डिपडिपवाला चहा.
आजूबाजूला एखादी टपरीवगैरे अशी मुळी संकल्पनाच नाही. अमृततुल्यचातर दूरदूरपर्यंत काही संबंध नाही.
दुधाची तहान ताकावर म्हणून मग मी अधेमधे डिपडिप चहा बनवते. बनवत असतानाच मला माहिती असतं की हा चहा काही माझ्या घशाखाली जाणार नाही. पण तरीही बनवते. पहिल्या २ घोटांतच माझी चहा पिण्याची हौस भागते. आणि मग तो चहा तसाच त्या कपात पडून रहातो.
रोज सकाळी ऑफीसला आल्यवर आणि दुपारी ४ वाजता हे असच होत.
असो त्यामुळे माझी चहा पिण्याची सवय तरी कमी होतेय. हेही नसे थोडके ः)

इथे जीवाभावाची मैत्री, सलोखा, मैत्रीमधील विश्वासार्हतेची ऊब - सुखदुःखांची देवाणघेवाण या सगळ्यांचा अभाव आहे. अगदीच व्यवहारी लोक आहेत अस नाही. बोलणे, एकमेकांचे अनुभव कथन करणे, सल्ला देणे/मागणे अस्ं सगळ असत ना पण त्यालाही एक चौकटसीमा आहे. हे शब्दांत नाही सांगता येणार. अनुभवानेच येईल लक्षात. कदाचित त्या मैत्रीमधे भावनेचा ओलावा नाही.
अळवाच्या पानावर पडलेला पाण्याच्या थेंबाशी त्या पानाचं जसं नात असत ना तस काहीसं.
एकमेकांना स्पर्शूनही, त्या स्पर्शाची जाणीव नसल्यासारखं
आपले देशवासीयही आहेत की! पण प्रत्येकजण गरजेपोटी एकमेकाला धरुन असतो. प्रत्येकाला आधाराची गरज आहे. अडीनडीला कोणीतरी असावं आपलं म्हणून बांधलेली मैत्री आहे. या मैत्रीमधे कोणती गृहितकं नाहीत. सगळ फॉरमॅलिटीजना धरुन चाललेलं.

दिवसभर ऑफिसच्या आंग्रजाळलेल्या वातावरणात राहिल्यावर, मायभाषेत बोलण्याची भूक खवळून उठते. मग ट्रेनमधून उतरल्या उतरल्या कोणालातरी फोन लावते आणि चालत चालत घरी पोचेतो अधाशासारखी बोलत रहाते. जणूकाही एखाद्या मुक्या व्यक्तीला वाचा फुटलीये आणि किती बोलू न किती नको अस झालय तिला.एखादं टम्म भरलेल्या भुशाच्या पोत्याला कोणीतरी छिद्र पाडाव आणि त्यातला भुसा सरसरं सरसरं खाली पडावा.. तस्स्ं ः)
चालता चालता परत ऑफिसजवळ पोचलेसुद्धा!
तर हा वॉक म्हणजे, 'त्या' वातावरणापासून थोडं वेगळं होऊन,मन आणि बुद्धि दोघींना ताजतवानं करणं.
या आणि अशा अनेक लहानसहान गोष्टी.. म्हटल आज मिळालाच आहे वेळ तर टायपूयात जरा...

नियमितपणे बोलत राहू अशी आशा ठेवून..