Thursday, November 7, 2013

ए सखी उलझन.. ना सखी सुलझन

६ चा अलार्म वाजला. तिघेहि उठले, ती, तिचा नवरा आणि ३ वर्षांचा मुलगा.
झटपट आवरुन दोघेजण(नवरा आणि मुलगा) बरोबरच घराबाहेर पडले मुलाला शाळेत सोडुन मग नवरयाने ऑफ़िस गाठायचे होते.
आता तिच्यासमोर पूर्ण दिवस होता. व्यायाम,अंघोळ,नाष्ता,देवपूजा झाली घड्याळाकडे पाहिले, आताशी दहाच वाजलेत.
तिच्या मनातली अबोली : ह्म्म सगळी काम आटोपली. काय करु आता? वेळच वेळ आहे माझ्याकडे. पण कधीकधी हा वेळ खायला उठतो मला..
३ महिन्यांपूर्वी अमेरिकेला जायचे या विचारने किती खुश होते मी! अहोंना US चा प्रोजेक्ट मिळाला.. मला नोकरीतून बदली मिळाली नाही त्यामुळे ती सोडावी लागली. वाईट वाटले थोडे नोकरी सोडताना पण, रोजचीच नोकरी आणि पाट्या टाकणे यातून सुटका होणार, मुलाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल, आईपणाचं सुख पुरेपुर उपभोगता येईल या विचारांनी मनाला उभारी आली.
पण  इकडे आल्यावर ३ महिन्यांतच हा बहर ओसरला. तिकडे भारतात असताना सकाळी ६ ला दिवस सुरु व्हायचा. ऑफिसची तयारी करुन सकाळी ७ वाजताच मुलाला आईकडे सोपवायचे. झोपेतच असायचा तो! बस पकडून ८.३० पर्यंता ऑफिस गाठायचे. मग़ थेट संध्याकाळी ७.३० लाच घरी परत. मुलाला आईच्या घरून घ्यायचे आणि स्वतःच्य घरी पळायचे. १२ तासांच्या विरहानंतर आईला पाहिल्यावर माझा सोनुला एक मिनिटही मला सोडायचा नाही. मग पूर्ण संध्याकाळ त्याच्यासाठीच. त्याला घेऊन कसबसं घरातील काम उरकायच जेवायच नी झोपायच. झाल संपला दिवस. एक पाटी टाकून झाली.. नवरा आणि मी फक्त वीकेन्डलाच काय ते निवांत एकमेकांशी समोरासमोर बोलत असू. नाहीतर वीकडेजमधे फक्त फोनवरच आमच बोलण!
इथे आल्यावर एकदम मोकळ वाटल! कसलीच तकतक नाही. दिवस आपलाच. दिवसभर मुलाच खाणपिण, स्वैंपाक यात वेळ जातो. पण दिवसभर घरकाम करत रहायची सवय नाही त्यात इथे धुण्या-भांड्याला बाया नसतात. सगळ आपणच करा. AC मधली बैठी नोकरी सोडून ही काम करायची, हे काही अजून पचनी पडत नाही.
कधी मनात येत की आपण ही इंजिनियरची डिग्री घेतली ती कशासाठी? असं घरी बसून रांधा, वाढा करायचं होत तर इंजिनियरींगचा हट्ट कशाला?  ... पण मग मुलाच काय़ तो थोड कळता होईतो त्यच्याकडे लक्ष देणही गरजेच आहेच की!
हम्म्.. असो विचार करू तेवढा कमीच आहे.चला जरा संगणकावर हात फिरवू...
फेसबुकवर लॉगिन करु. तेवढाच वेळ जाईल.
अय्या ही तर समिधा आहे. ही पण US मधेच आहे वाट्ट. काय करते? ... करंटली नॉट वर्किंग! हाउसवाईफ़? अरे ही २ मुले तिचीच दिसताहेत... आणि हब्बी.. वर्किंग ऍट माइक्रोसॉफ्ट.. सह्ही.. तशी समिधापण हुशार बरं का.. मेरीटलिस्टमधे चमकलेली! मागच्या वर्षी भेटली होती मला.. टीमलीड होती, पी.म. साठी
ड्यू आहे अस म्हणाली.. सध्या घरीच आहे अस दिसतय.
ही .. नमिता.. हिला एक मुलगा आहे असे दिसतेय.. करंट सिटी सिडनी.. व्वा.. हिचा जॉब तर व्यवस्थित चालू आहे. आणि हे फोटोमधे कोण दिसतय.. ओ.. तिची आई आहे तर.. तरीच.. आई सांभाळत असणार मुलाला.. म्हणूनच तर तिचा जॉब व्यवस्थित सुरु आहे.
पण मग बरयाच मुलींची हिच गत आहे. लग्नानंतर मुलांना सांभाळणारे घरचे कोणी नसेल किंवा परदेशी गेलेले जोडपे असेल तर अशावेळी मुलींनी आपल्या पोरांना डे-केअरला ठेवण्यापेक्षा स्वतः घरी रहाणेच पसंत केलेय.
मला आठवतय.. शर्मिलाच्या बाबतीत तर अस नव्हत. तिचे सासू-सासरे घरीच असतात. पण सासूने सारखा तगादा लावला होता, 'आम्हाला तुझ्या नोकरीची गरज नाही'. नवराही तिला ऐकवायचा, 'मला तुझ्या पैंशांची गरज नाही'. तिने बरेच दिवस दुर्लक्ष केले. पण मग मुलीला सांभळणयावरून वाद झाले आणि मग तिला नाईलाजाने नोकरी सोडावी लागली. सध्या घरी शिकवण्या घेते आहे. शर्मिला खुपच हुशार आणि जिद्दी मुलगी. सॉफ्ट्वेअरमधली नोकरी मनापासून आवडायची तिला. परदेशगमनाची संधी चालून आलेली पण घरच्यांनी विरोध केल्यामुळे ती घेता आली नाही.
मुलींच्या बाबतीत हेच होणार असेल तर त्यांनी ग्रॅज्युएशनच्या आधीच विचार करायला हवा नाही का! म्हणजे इंजिनियरींगची एक सीट एखाद्या गरजू मुलाला तरी देता येईल. असही ओपन कॅटेगरीमधल्या मुलांसाठी ऍडमिशन घेणे कठीण झालय. त्यांना तरी याचा फायदा होईल.
एकदा तर चिडून मी नवरयाला म्हटल की तू घरी बस मी जाते नोकरीला. विशेष म्हणजे तोही तयार झाला. तो तयार झाला म्हटल्यावर माझा बायकी अहंकार (जसा पुरुषांचा पुरुषी अहंकार तसा स्त्रीयांचा बायकी अहंकार) सुखावला. पण शेवटी सारासार विचार केला, तो माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठा, त्याच्याएवढा पगार मला लगेचच नाही मिळणार. मग म्हटल जाऊ देत सध्या तरी तूच कर जॉब...
पण मग आता काय? हा रिकामा वाटणारा वेळ भरून कसा काढायचा?
हम्म्.. एक करता येईल.. ऑफिसच्या रुटीनमधे असताना ज्या ज्या गोष्टी कराव्याशा वाटायच्या पण वेळेअभावी करता येत नव्ह्त्या त्या सगळ्या मनसोक्त करुयात. सगळे पुराणे छ्ंद जोपासूयात. लेखन, कार्डस बनवणे, फोटोग्राफी, गायन... खरचं की... हे मला आधी का नाही सुचले..
बिचारा नवरा त्याला अशी संधी कधी मिळायची नाही. आपल्याला मिळते तर तिचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा..
असं म्हणत तिने तिची पेटी काढली, धूळ झटकली. गाण्याच्या क्लासची जुनी वही काढली आणि भैरवी गायला सुरुवात केली... 'जागो मोहन प्यारेSS  जाSSगो ' :):)